गुवाहाटी : ‘अरुणाचलप्रदेशात भारत-चीन सीमाभागात भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल दोन हजार मोबाइल टॉवर्स उभारणार आहे. दूरसंचार विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे,’ अशी माहिती ‘बीएसएनएल’च्या आसाम परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक संदीप गोविल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘हा प्रदेश दुर्गम असल्याने अरुणाचलप्रदेशच्या चीन सीमेलगत असलेल्या भागात एकही मोबाइल टॉवर नाही. त्यामुळे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसदलासह लष्करालाही या सीमाभागात गस्त घालताना अडचणी येतात. अरुणाचलप्रदेशमध्ये वेगवेगळ्या भागात चीनचे सैन्य वारंवार घुसखोरी करत असते. त्यामुळे या प्रदेशात मोबाइल कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी मोबाइल टॉवर्स उभारावेत अशी सुरक्षा दलांची दीर्घकाळापासून मागणी होती. आता अरुणाचलप्रदेशात भारत-चीन सीमेवर उभारण्यात येणाऱ्या उच्चक्षमतेच्या मोबाइल टॉवर्समुळे या भागात चांगली मोबाइल कनेक्टिव्हिटी मिळेल.’
‘आसाममध्येही फोर जी सेवा देण्यासाठी बीएसएनएल दोनशे कोटींची गुंतवणूक करत असून, येत्या मार्च महिन्यापासून ही सेवा सुरू होईल. यासाठी लागणारी सर्व आवश्यक उपकरणे कोलकाता विमानतळावर पोहोचली असून, या महिन्याच्या अखेरीस ती आसाममध्ये पोहोचतील. यामध्ये तीन हजार ५०० बेस ट्रान्सिव्हर स्टेशन्स (बीटीएस) आहेत. फोर जी सेवा दाखल झाल्यानंतर ग्राहकांना दररोज २३ टीबी डेटा वापराची मर्यादा निश्चित केली जाईल,’ असेही गोविल यांनी सांगितले.
गोविल पुढे म्हणाले, ‘आसाममध्ये ‘बीएसएनएल’चा वायरलेस क्षेत्रात ११.७ टक्के हिस्सा आहे, तर संपूर्ण देशभरात एकूण हिस्सा ९.७१ टक्के आहे. मोबाइल क्षेत्रात आसाममध्ये ‘बीएसएनएल’चे तब्बल २५ लाख ग्राहक आहेत.’